लोकनेते स्व. विलासरावांच्या स्मृती – आठवणी’ लातूर पुर्त्या मर्यादित नाहीत तर राज्यभर रुजल्यात..!
दिवंगत मुख्यमंत्र्यां विषयी भाजपाध्यक्षांचे विधान असुयायुक्त व विकृती दर्शवणारे..!
काँग्रेस कडून निषेध व्यक्त..
पुणे : भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूर मधील प्रचार सभेत दिवंगत मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे विषयी ‘लातुरकर विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसुन टाकतील’ असे अहंकारी, असुयायुक्त व विकृती दर्शवणारे विधान सत्तेच्या धुंद नशेत केले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी तीव्र निषेध केला.
ते पुढे म्हणाले की, लोकनेते स्व. “विलासरावांच्या स्मृती – आठवणी’ लातूर पुर्त्या मर्यादित” नाहीत राज्यभर रुजल्या असून स्व विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री होते याचे भान ठेवावयास हवे होते.
राज्यातील ‘शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर’, पित्या सोबत मातेचे नांव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी स्वपुढाकाराने घेतल्याने, राज्यातील माता भागिनींची प्रतिष्ठा उंचावण्याचेच काम त्यांनी केले.
तसेच स्व विलासरावजी यांनी तत्कालीन विरोधी पक्ष नेते स्व गोपीनाथ मुंडे यांना विरोधीपक्ष नेते पद बहाल करून त्यांचा मान सन्मान सदैव जपला तसेच राजकीय मतभेद कायम ठेऊनही त्यांच्या व गोपीनाथ मुंडेंच्या निखळ मैत्री’चा अध्याय देखील महाराष्ट्राने अनुभवला होता.
गुजरात मधील भूकंप समयी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजींच्या निर्देशानुसार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी गुजरात मधील काही गांवे दत्तक घेऊन पुनर्वसन केले होते.. या त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे किमान स्मरण रविंद्र चव्हाणांनी ठेवले पाहिजे होते, मात्र भाजप’च्याच् ज्येष्ठ व दिवंगत नेत्यांचे संस्कार व आठवणी पुसणाऱ्या भाजप’च्या विद्यमान व्यवसायिक नेत्यांना ते कसे राहणार असा उपरोधिक टोला ही काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी लगावला.
